वासिंद : भारतीय संविधानाविषयी जनजागृती व्हावी, ते घराघरात पोहोचावे म्हणून कल्याण येथील नागसेन बुक डेपोच्या वतीने शहापूर तालुक्यातील वासिंद येथील क्षण मंगल कार्यालयात ‘भारतीय संविधान घराघरात’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी ‘भारतीय संविधान आणि वास्तव’ या विषयावर ओबीसी, संघर्ष समन्वय समितीचे राज्य सरचिटणीस राजाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. ‘भारतीय संविधान माहिती असणे ही काळाची गरज आहे. असे कार्यक्रम पोलिसांनी, आमदारांनी, खासदारांनी आयोजित केले पाहिजेत,’ असे सांगून संविधानाविषयी विविध उदाहरण व अनुभव राजाराम पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
अंतर्मनाच्या सामर्थ्याचा आविष्कार असलेल्या हिप्नॉटिझमवर आधारित मनोरंजनात्मक कार्यक्रम, प्रात्यक्षिके संमोहनत सिकंदर जरीपटके यांनी सादर केली. या वेळी नितीन गिरी उपस्थित होते.
‘भारतीय संविधान हे प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवणे, हा माझा उद्देश असून ही माझी सामाजिक जबाबदारीसुद्धा आहे. म्हणून मी विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानाविषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहे,’ असे नागसेन बुक डेपोचे सोमनाथ भोसले यांनी सांगितले.